दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून शेतकरी नामदेव पौळ यांच्या गोठ्यातील नऊ म्हशींपैकी सात म्हशींचा मृत्यू, तर दोन म्हशी उपचाराखाली जीवासाठी झुंजत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकरी नामदेव पौळ यांनी सांगितले की, “सायंकाळच्या सुमारास अचानक म्हशींना त्रास होऊ लागला. काही वेळातच सात म्हशींचा मृत्यू झाला. तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून उर्वरित दोन म्हशींवर उपचार सुरू आहेत.”
घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत म्हशींचा पंचनामा करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शेतकरी पौळ यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला असून, गावातील नागरिक आणि शेतकरी वर्गात दुःख व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई आणि तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. “शेतकऱ्याच्या आयुष्यभराच्या कष्टाचे हे फलित आहे, शासनाने त्वरित मदत करावी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

0 Comments