मंद्रुप (सोलापूर ग्रामीण) : शेतीच्या हद्दखुणांवरून वाढलेल्या वैमनस्याचा परिणाम म्हणून एका कुटुंबावर सत्तुर व काट्याने गंभीर हल्ला केल्याची घटना 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शांताबाई लक्ष्मण गावडे (वय वर्षें 57) या आपल्या गावडेवाडीतील शेतीवस्तीत मुलगा लिंगराज, सागर व कुटुंबीयांसह राहत असताना, शेजारील शेतकरी राजू व्हनमाने व त्याचे मुलगे दीपक व चेतन यांच्यासोबत हद्दखुणांच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता.
11 नोव्हेंबर रोजी शांताबाई यांच्या गायीने आरोपिंच्या शेतात प्रवेश केल्याने राजू व्हनमाने यांच्याकडून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर 13 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता आरोपित राजू व्हनमाने, दीपक, चेतन व दोन अनोळखी इसम वस्तीवर येऊन शांताबाई यांच्यावर हल्ला चढवला.
राजू व्हनमाने यांनी सत्तुरने शांताबाई यांच्या डोक्यात वार केला, तर मुलगा लिंगराज व सागर भांडण सोडवायला गेले असता दीपक व चेतन यांनी काट्याने वार करून त्यांना जखमी केले. अनोळखी दोन इसमांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. घटनेत सर्वांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातून सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर येथे रेफर करण्यात आले.
शांताबाई गावडे यांच्या फिर्यादीनुसार राजू व्हनमाने, दीपक व्हनमाने, चेतन व्हनमाने आणि दोन अनोळखी आरोपींवर मारहाण, जखमी करणे, धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज मोहन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

0 Comments