अनगर नगराध्यक्ष निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; उज्वला थिटेची पहिली प्रतिक्रिया:
सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज : जिल्ह्यातील अनगर नगरपरिषद निवडणूक यंदा प्रचंड चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून बाद करण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायालयानेही त्यांचे अपील फेटाळले. यानंतर अनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून, त्यावर थिटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उज्वला थिटे म्हणाल्या, “नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झाल्याचा आनंदच म्हणावा लागेल. नियतीचे फासे फिरले आहेत. पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा? अर्ज भरताना मुद्दाम अडथळे निर्माण केले गेले आणि तांत्रिक कारण सांगून अर्ज बाद करण्यात आला.”
थिटे यांनी आरोप केला की, जिल्हा न्यायालयात गेल्यावरही त्यांच्या कागदपत्रांमध्ये गहाळपणा निर्माण केला गेला आणि त्यांच्या विरोधात निकाल लागला. “त्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. प्रत मिळताच उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. 20 तारखेपर्यंत स्थगिती लागू आहे. उच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत निवडणूक पुढे ढकलण्यात यावी,” अशी त्यांची मागणी आहे.
अर्ज का बाद झाला?
उज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणात नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर सुचकाची सही नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरवला. याविरोधात जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतरही त्यांना दिलासा मिळाला नाही.
थिटे म्हणाल्या, “उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार. तिथे न्याय न मिळाल्यास सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवू.”
अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्थगिती मिळाल्याने, पुढील राजकीय घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.


0 Comments