Advertisement

Breaking News
Loading...

विमानसेवेच्या प्रश्नावर सोलापूर विकास मंचाची जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा! सोलापूरकरांच्या भावना जाणून घेण्यासाठी घेतलेल्या व्हॉट्सअॅप पोलची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढील सोलापूर दौऱ्यात सविस्तर बैठक घेण्याचे आश्वासन...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | सोलापूरची विमानसेवा वारंवार बंद होणे, विमानफेऱ्या रद्द होणे आणि प्रस्तावित नवीन विमानसेवा प्रत्यक्षात सुरू न होणे, या गंभीर प्रश्नावर सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विमानसेवेबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, सोलापूरकरांमध्ये वाढत असलेली नाराजी तसेच शहराच्या भविष्यातील औद्योगिक आणि आर्थिक विकासावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत मंचाने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

सोलापूर–मुंबई विमानसेवा पुन्हा अनिश्चित काळासाठी बंद होणे, Fly91ची सोलापूर–गोवा व सोलापूर–हैदराबाद सेवा नियमितपणे सुरू नसणे आणि सोलापूर–तिरुपती विमानसेवा अद्याप सुरू न होणे, या सर्व बाबींची माहिती शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

व्हाट्सअप पोलमधून सोलापूरकरांचा संताप समोर

विमानसेवेबाबत सोलापूरकरांच्या भावना जाणून घेण्यासाठी सोलापूर विकास मंचाने व्हॉट्सअॅप पोल आयोजित केला होता. या पोलला मिळालेल्या प्रतिसादातून विमानसेवेतील अनिश्चितता आणि प्रशासनाच्या या विषयाकडे पाहण्याच्या पद्धतीबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे मंचाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

“विमानसेवा ही निवडणुकीपुरती आश्वासने देण्याची बाब नसून सोलापूरच्या विकासाची मूलभूत गरज आहे,” अशी भूमिका मंचाने मांडली.

विमानसेवा नसेल तर गुंतवणूक आणि आय.टी. पार्कचे काय?

सोलापूरमध्ये नवीन उद्योग, आय.टी. पार्क आणि मोठ्या गुंतवणुकीच्या चर्चा होत असताना शहराची हवाई कनेक्टिव्हिटी मात्र अनिश्चित राहणे हा गंभीर विरोधाभास असल्याचे मंचाने स्पष्ट केले.

मुंबई, हैदराबाद, गोवा, पुणे आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांशी नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्यास बाहेरील गुंतवणूकदार, आय.टी. कंपन्या आणि व्यावसायिक सोलापूरला प्राधान्य देतील का, असा सवाल मंचाने उपस्थित केला.

“विश्वासार्ह विमानसेवेअभावी नवीन गुंतवणूक सोलापूरमध्ये आणणे कठीण होईल आणि त्याचा थेट परिणाम आय.टी. पार्कच्या भवितव्यावर तसेच रोजगारनिर्मितीवर होऊ शकतो. त्यामुळे विमानसेवेचा प्रश्न हा केवळ प्रवाशांच्या गैरसोयीचा नसून सोलापूरच्या भविष्यातील विकासाचा प्रश्न आहे,” असे मंचाने स्पष्ट केले.

होटगी रोड विमानतळ आणि बोरामणीबाबतही चर्चा

विद्यमान होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगसह आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून विमानसेवा नियमित करण्याची गरज असल्याचे मंचाने सांगितले. तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावाबाबतही पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

होटगी रोड विमानतळाचा विकास आणि बोरामणी विमानतळ या दोन्ही पर्यायांचा तांत्रिक, आर्थिक आणि भविष्यातील प्रवासी मागणीच्या आधारे तुलनात्मक अभ्यास करून त्याची माहिती सोलापूरकरांसमोर ठेवावी, अशी भूमिका मंचाने मांडली.

पालकमंत्र्यांच्या पुढील दौऱ्यात सविस्तर बैठक

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासोबत झालेली आजची चर्चा सकारात्मक आणि आश्वासक झाली, अशी माहिती सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाने दिली.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढील सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर विकास मंचासोबत विमानसेवेच्या प्रश्नावर सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सोलापूरच्या विमानसेवेची सद्यस्थिती, भविष्यातील विमानसेवा, नाईट लँडिंग, होटगी रोड विमानतळाचा विकास, बोरामणी विमानतळ तसेच सोलापूरच्या औद्योगिक व आय.टी. विकासाशी संबंधित हवाई कनेक्टिव्हिटी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

आजची चर्चा सकारात्मक असली तरी सोलापूर विकास मंच आता केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून प्रत्यक्ष निर्णय आणि कालबद्ध कृतीकडे लक्ष ठेवणार आहे. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, मनोज क्षीरसागर, प्रा. प्रसन्न नाझरे, सुहास भोसले, गणेश पेनगोंडा आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. 

“सोलापूरला घोषणांचे नव्हे, तर नियमित आणि विश्वासार्ह विमानसेवेचे पंख हवेत. विमानसेवा मजबूत झाली तरच उद्योग, गुंतवणूक, आय.टी. पार्क आणि रोजगाराला गती मिळेल. प्रशासनासोबत सकारात्मक संवाद ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर विकास मंच सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” अशी भूमिका मंचाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


Post a Comment

0 Comments