दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र परिवाराकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तालुक्यातील बोरामणी, तांदुळवाडी, मुस्ती, संगदरी, मुळेगाव, मुळेगाव तांडा, दोड्डी, कासेगाव, उळे, वडजी, बक्षी हिप्परगे, वरळेगाव, गंगेवाडी, कुंभारी, वळसंग यासह अनेक गावांमध्ये पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची वस्तुनिष्ठ पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून दक्षिण सोलापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, आप्पा हलसगे, मनोज कोरे, अतुल कळके उपस्थित होते.




0 Comments