सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिकेतील राखीव जागांच्या फेरआरक्षणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. बसवराज बगले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 17 नोव्हेंबरला काढलेल्या फेरआरक्षणासह 2 डिसेंबरच्या अंतिम अध्यादेशाविरुद्ध त्यांनी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करून पहिल्या — म्हणजे 11 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित केलेल्या — आरक्षणास कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
डॉ. बगले यांनी याचिकेत नमूद केले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने केवळ प्रभाग 24 (भारती विद्यापीठ भाग) मध्ये अनावश्यक हस्तक्षेप करून ‘ओबीसी सर्वसाधारण’ जागेवर थेट ‘ओबीसी महिला’ आरक्षण लादले. या प्रभागात आधीच अनुसूचित जमाती महिला सीट राखीव असताना दुसरे थेट महिला आरक्षण देणे हे नियमबाह्य असून यामुळे प्रभागातील आरक्षण संरचनेत विसंगती निर्माण झाली.
निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे महिलांच्या हक्कांवरही गदा आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यापूर्वी 25 नोव्हेंबरला डॉ. बगले यांनी आयोगाकडे अपील दाखल केले होते; मात्र त्याची दखल न घेता शासनाने फेरआरक्षण अंतिम केले असल्याची नोंद याचिकेत आहे.
डॉ. बगले यांनी असा गंभीर आरोप केला आहे की, एका भाजप आमदाराच्या सुपुत्राच्या फायद्यासाठी दबावाखाली फेरआरक्षण करण्यात आले, ज्यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांचे उल्लंघन झाले.
● कोल्हापुरातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका वर्ग:
कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर याचिकेतील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ती तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केली. यानुसार प्रकरणाची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर होणार आहे.

0 Comments