भंडारकवठे | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
टाकळी गावचे विद्यमान सरपंच भौरव्वा कोळी यांनी भंडारकवटे जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून बैठका व प्रचाराला अधिकृत सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भौरव्वा कोळी या टाकळी गावाच्या विद्यमान सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात गावात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा यासह अनेक प्रश्न मार्गी लागले असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अडचणीत असलेल्या नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करून त्यांना दिलासा देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
दरम्यान, भौरव्वा कोळी यांचा मुलगा सतीश कोळी हे मागील १० ते १५ वर्षांपासून सोलापुरातील शासकीय दवाखान्यात सेवा बजावत आहेत. समाजसेवा आणि रुग्णसेवा हेच आपले ध्येय मानून त्यांनी आजवर कार्य केले आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य सर्वश्रुत आहे. त्या कठीण काळात गरीब व गरजू रुग्णांना मदत, औषधे, साहित्य वाटप करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सतीश कोळी हे तालुक्यातील गुणवंत कुस्ती सराव करणाऱ्या खेळाडूंना दरमहा ठराविक रकमेची खुराक स्वरूपात मदत करतात, तसेच यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या वतीने पुस्तके किंवा आर्थिक सहाय्य सातत्याने देत असतात.
याशिवाय, सरपंच पदाच्या काळात सतीश कोळी यांनी पुढाकार घेऊन गावातील अनेक विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. गरजू कुटुंबांना मदत, समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न आणि प्रशासनाशी समन्वय साधून कामे मार्गी लावण्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्या काळात टाकळी गावाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून भौरव्वा कोळी यांना जर यश मिळाले, तर भंडारकवटे गटात आणखी मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार भौरव्वा कोळी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन विद्यमान सरपंच भौरव्वा कोळी आणि त्यांचे पुत्र सतीश कोळी यांनी नागरिकांना केले आहे.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या प्रचार मोहिमेकडे आता संपूर्ण गटाचे लक्ष लागले असून, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून भौरव्वा कोळी कोणती बाजी मारतात, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

0 Comments