मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ मध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील (शिरापूर सो.) यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे विविध विकासकामांची मागणी केली.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे (पंढरपूर), तहसीलदार सचिन मुळीक (मोहोळ), सावळेश्वरचे मंडळ अधिकारी भाऊसाहेब दळवी तसेच मंडळातील सर्व तलाठी उपस्थित होते.
यावेळी अनिल पाटील यांनी सावळेश्वरचे मंडळ अधिकारी भाऊसाहेब दळवी यांच्या कामकाजाचे कौतुक केले. श्रावणबाळ योजना, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित दाखले किंवा शेतकऱ्यांची महसुली कामे प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने केली जात असून कोणाकडूनही पैशांची मागणी केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. दळवी यांनी सावळेश्वर मंडळात रुजू झाल्यापासून नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने काही महत्त्वाच्या मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची योजना तातडीने सुरू करावी, मंडळातील सर्व गावांमध्ये पांदण रस्ते व शिवरस्ते तात्काळ करावेत तसेच सीना नदीतील गाळ काढून नदीपात्राचे रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच मोहोळ तालुक्यातील रस्ते आणि शेतीशी संबंधित प्रकरणे तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून ती लवकर निकाली काढावीत, अन्यथा वादविवाद वाढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाने या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी नम्र विनंती शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.



0 Comments