मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ तालुक्यातील लांबोटी–शिरापूर मार्गावर वारंवार बाभळीची झाडे रस्त्यावर कोसळत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. आतापर्यंत या रस्त्यावर चार वेळा बाभळीची झाडे पडल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे ट्राफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. तसेच भविष्यात मोठी जीवितहानी होण्याचीही दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेली झाडे हटविणे किंवा त्यांची छाटणी करणे आवश्यक असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, मोहोळचे अधिकारी विजय कदम यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच "हॅलो रिपोर्टर" न्यूज टीमने विजय कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
प्रशासनाने तातडीने धोकादायक झाडांचा प्रश्न मार्गी लावून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



0 Comments